घोलमेरझा तख्ती इराण व खाशाबा जाधव भारत - समान कर्तुत्व मात्र देशाचा भिन्न आदर्शवाद
1952 चे हेलसिंकी ऑलिंपिक हे तमाम भारतीयांच्यासाठी अभिमानाचे, आनंदाचे आणि प्रेरणादायी आहे.याच ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिंपिक चे पहिले कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.कुस्तीसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारात जिंकलेले स्वतंत्र भारताचे पहिले पदक भारतीय खेळाडूंना नेहमी प्रेरणा देत राहिले.पण याच हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये इराण देशाचे पैलवान घोलमेरझा तखती यांनी सुद्धा ऑलिम्पिक सारख्या मानाच्या स्पर्धेत इराण रौप्यपदक ते सुद्धा कुस्तीत जिंकून इतिहास रचला.भारत आणि इराण देशाच्या बाबतीत कुस्ती खेळात घडलेली ही समान घटना आज एवढ्यासाठी सांगतोय की ज्या व्यक्तीने इराण साठी हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये रौप्यपदक जिंकून त्या घोलमेरझा तखती यांच्यासाठी इराण देश "आंतरराष्ट्रीय तखती कप" सारखी कुस्ती स्पर्धा प्रतीवर्षी आयोजित करतो.मात्र आम्ही मात्र ज्यांनी देशाला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक देशाला जिंकून दिले अश्या खाशाबा जाधव यांना कितपत जिवंत ठेऊ शकलो?
इराण देशाने आजवर 76 पदके नुसत्या ऑलिमिक मध्ये कुस्ती या खेळात जिंकली ज्यात 24 सुवर्ण,23 रौप्य आणि 29 कांस्यपदक आहेत.
घोलमेरझा तखती हे इराणी पैलवानांचे नुसते आदर्श नाहीत तर त्यांच्या नावे इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेते.
ही माहिती मला समजली ते अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मुखातून.नुकतेच मुंबईला कामानिमित्त जाताना आवर्जून काकासाहेब यांची भेट घेण्याचा योग आला.योगायोगाने माझ्या समवेत खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित दादा जाधव होते आणि सोबत ऑलिंपिक चे पहिले पदक सुद्धा होते.काकांनी ते पदक कपाळाला लावले आणि क्षणभर शांत झाले.त्यांच्या डोळ्यात एक आंनद उमटला.त्यांनी क्षणात सांगितले की आमचे भाग्य आहे की हे पदक मी माझ्या हातात घेऊ शकलो.त्यानंतर ते बोलू लागले की इराणी पैलवान घोलमेरझा तखती याने 1952 ग्रीष्म ऑलिंपिक मध्ये म्हणजे ज्या स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी पदक जिंकले त्याच स्पर्धेत इराण ला रौप्यपदक जिंकून दिले त्यांच्या नावाने इराण आंतरराष्ट्रीय तखती कप घेतो.आणि आपण मात्र खाशाबा जाधव यांना कितपत आदर्श मानतो हे एक न सुटलेले गणित आहे.
यावर समोरच बसलेले शासकीय कुस्ती कोच शिवाजी कोळी सर बोलले की महाराष्ट्राने सुद्धा भारतीय कुस्ती संघाला विनंती करुन खाशाबा जाधव ही कुस्ती स्पर्धा केवळ राज्य आणि राष्ट्र न ठेवता आंतरराष्ट्रीय स्पर्धा केली पाहिजे.
यावर दुजोरा देत काकासाहेब सुद्धा म्हणाले की आता कुस्तीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर महाराष्ट्राने केवळ ऑलिम्पिक पदकाचे ध्येय ठेवावे.आम्ही सर्वांनी मिळून ही खाशाबा जाधव स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा कशी होईल यासाठी झटले पाहिजे.
खर सांगतो मंडळी ज्यांनी ऑलिंपिक स्पर्धेत जाण्याचे स्वप्न पाहिले,जीवतोड कष्ट केले,जीवन वाहिले अशानाच अशी भव्य संकल्पना सुचू शकते.
घोलमेरझा तखती यांनी एकूण 3 ऑलिम्पिक पदके जिंकली.ऑलिम्पिक पदक जिंकणारे असंख्य पैलवान इराण मध्ये असूनही घोलमेरझा तखती हे आजही नवोदित मल्लांचे प्रेरणास्थान बनले आहेत.आपण सर्वांनी मिळून खाशाबा जाधव यांच्या नावे आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्माण होईल यासाठी सर्वांगीण प्रयत्न केला पाहिजे.
विडिओ पहा:
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com