महान पैलवान गुंडाजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तीही लोकी झेंडा
कोल्हापूरच्या कोपार्डे गावाला कुस्ती मल्लविद्येची महान परंपरा आहे.
त्याच गावात एक झंझावात जन्माला आला ज्यांनी अत्यंत कमी वयात आणि कमी वेळेत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील मल्लाना कोल्हापूरचे पाणी पाजले. ज्यांनी अत्यंत कमी वेळेत कोल्हापूर महापौर केसरी , मुंबई महापौर केसरी ,ठाणे महापौर केसरी ,डबल महाराष्ट्र कामगार केसरी असे किताब मिळवून त्यांच्या जोडीत एकही असा मल्ल ठेवला नाही ज्यांना चारी मुंड्या चीत केले नाही.
त्यांचे नाव पैलवान गुंडाजी पाटील.
कोल्हापूरच्या कसबा बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तम राव पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून अल्पावधीत कुस्तीक्षेत्रात त्यानी आपला दबदबा निर्माण केला.
कुस्तीतील प्रत्येक डावावर कमांड ठेवत दिग्गज मल्लाना आसमान दाखवत गुंडाजी पाटील नावाचे वादळ हळूहळू महाराष्ट्रभर पुढे सरकत होते.
‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या समजल्या जाणार्या गदेसाठी सर्व स्थरातून एकच नाव त्याकाळी सर्वांच्या मुखात येत होते गुंडाजी पाटील.
पण कुस्ती क्षेत्रात वर वर दिसणार्या सरळ मार्गाच्या खोल आत एक असे राजकीय गटार आहे कि विचारूच नका ,या घाणेरड्या राजकारणाने भल्याभल्या चांगल्या पैलवानांच्या आयुष्याचे वाटोळे केले आहे.
अंगात धमक,उरात धाडस आणि हनुमंताची कृपा सर्वकाही असताना पैलवान गुंडाजी पाटील याला हयातभर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळूच दिले नाही.
का ?
ते आजही कोणालाच ठावूक नाही ,आणि विचारायचे धाडस पण नव्हते कोणाच्यात ..!!
प्रामाणिक कष्ट करूनही खेळाडूंच्या वाटेलाही संघर्षच येतो.
हे जर असेच सुरु राहिले मंडळी तर मला सांगा कोणते सुद्न्य पालक आपल्या मुलाना खेळाडू करतील ?
गुंडाजी पाटील यांच्यावर झालेला हा अन्याय त्यानी सर्व मिडीया समोर आणला होता ,तरीही त्याची दाद घेतली गेली नाही.
त्यांना शेवट पर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळून दिले नाही.
महाराष्ट्रात दरवर्षी शिवसेने तर्फे ‘’सेना केसरी’’ हि मानाच्या गदेची कुस्ती स्पर्धा होत होती ..!
त्या वेळी ती स्पर्धा पुण्यात घेण्यात येणार होती.त्यावेळी मा.राज ठाकरे हे शिवसेनेचे नेते होते ,त्यांनी स्वत लक्ष घालून या स्पर्धेचे नियोजन पुण्यात केले होते.
त्या स्पर्धेसाठी गुंडाजी पाटील यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला.मात्र तिथेही मा.राज ठाकरे यांच्या कानावर हे राजकारण घातले कि सदर पैलवानास आपण या सामन्यात खेळवू नये.
मात्र राज ठाकरे यांनी सर्वांचा सल्ला मसलत करून त्याना उत्तर दिले कि स्पर्धा आम्ही घेत आहोत आणि कोणाला खेळवायचे आणि नाही ते आम्ही ठरवू ..!!
बस्स ,राज ठाकरे यांच्या त्या निर्णयामुळे गुंडाजी पाटील त्या स्पर्धेत खेळू शकले ..आणि त्यानी राज ठाकरे आणि सार्या महाराष्ट्राचा विश्वास सार्थ ठरवत धडाकेबाज कुस्त्या करायला सुरवात केली आणि एकेक तुल्यबळ आणि दिग्गज मल्लांना आस्मान दाखवत त्यानी त्या वर्षीची ‘’सेना केसरी’’ हि मानाची गदा जिंकली.
शिवसेनेच्या सर्व दिग्गज नेत्यांच्या हस्ते ती गदा त्याना प्रदान करण्यात आली.
कुस्ती पंढरी कोल्हापूर ने जरी गुंडाजी पाटील यांच्याकडे तोंड फिरवले होते मात्र कुस्तीचे माहेर पुणे मात्र सतत प्रामाणिक पैलवानांच्या बरोबर असते हे सिद्ध झाले.
पुण्यातील दिग्गज वस्तादांनी गुंडाजी पाटलांची अक्षरशः हत्तीवरून मिरवणूक काढली होती.
पुण्यात दुसरी दिवाळी साजरी होत होती.
ज्या पुण्याने भूमिपुत्रांचे सन्मान पहिले त्याच पुण्याच्या भूमीत कोल्हापूर च्या एका उपेक्षित मल्लाचा हत्तीवरून सन्मान होत होता.
सार्या महाराष्ट्राने तो दिमाखदार सोहळा पहिला.
घाणेरड्या राजकारण्यांच्या डोळ्यात या गोष्टीने अंजन गेले.
असे हे गुंडाजी पाटील.
आज नशिबाने जरी त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र केसरीची माळ घातली नसली तरी तत्कालीन वेळेला जे जे महाराष्ट्र केसरी झाले त्या सर्वाना गुंडाजी पाटील यांनी बिनजोड आसमान दाखवले होते हा इतिहास आहे.
जर ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गेले असते तर कमीत कमी ३ वर्षे तरी बिन्जोड महाराष्ट्र केसरी नक्कीच झाले असते असे अनेक कुस्ती अभ्यासकांचे मत आहे.
सध्या गुंडाजी पाटील कोल्हापुरात भारतीय पोष्टल खात्यात खेळाडू म्हणून नोकरी करतात.तेथेही त्यानी आखिल भारतीय पोष्टल कुस्ती स्पर्धात भाग घेवून आतापर्यंत 40 सुवर्णपदके मिळवली आहेत मात्र त्यांची वादळी कारकीर्द तमाम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही ..!!
पैलवान गुंडाजी पाटील याना कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मनाचा मुजरा.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.org
Tags
महान मल्ल